भारत-पाक युद्धात जाणार साडेबारा कोटी लोकांचा बळी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वॉशिंग्टन : ‘भारत-पाकमधील विद्यमान तणावाचे आण्विक युद्धात रूपांतर झाले तर त्यात दोन्ही देशांतील सुमारे १२.५ कोटी लोकांचा बळी जाऊन जगापुढे हिमयुगाचे गंभीर संकट उभे राहील’, असा इशारा अमेरिकन वैज्ञानिकांनी दिला आहे.

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या मुद्यावरून भारत-पाकमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकने याप्रकरणी आतापर्यंत अनेकदा भारताला अणुयुद्धाची धमकी दिली आहे. या स्थितीत खरोखरच उभय देशांत आण्विक युद्ध भडकले तर या युद्धात जवळपास १२.५ कोटी लोकांचा बळी जाईल, असा अंदाज अमेरिकास्थित रटगर्स विद्यापीठाच्या संशोधकांनी व्यक्त केला आहे. ‘भारत-पाक’मध्ये २०२५ साली अणुयुद्ध होईल, असा अंदाज गृहीत धरून त्यांनी हा आकडा काढला आहे.

दोन्ही शेजारी देशांत आतापर्यंत अनेकदा युद्ध झाले आहे. २०२५ पर्यंत या देशांकडे ४०० ते ५०० अणुबॉम्ब असतील. दोन्ही देशांनी एकमेकांवर अणुबॉम्ब टाकले तर त्यातून १.६ ते ३.६ कोटी टन राख निर्माण होईल. या राखेचा काळा धूर (कार्बन) वरच्या वातावरणात पोहोचल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच त्याची चादर संपूर्ण जगावर पसरेल. यामुळे हवा गरम होऊन धूर अत्यंत वेगाने वरच्या दिशेने जाईल, असे संशोधकांनी म्हटले आहे.

या प्रक्रियेत पृथ्वीवर येणाऱ्या सूर्य प्रकाशात २० ते ३० टक्के घट होईल. यामुळे पृथ्वीचे तापमान २ .५ अंश सेल्सिअसने कमी होऊन जगभरात होणाऱ्या पर्जन्यमानातही १५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट होईल. याचा जीवनमानावर अत्यंत गंभीर परिणाम पडेल, असे ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ नियतकालिकात नमूद करण्यात आले आहे. या स्थितीत जागतिक पातळीवरील शेत पिकांचा विकास १५ ते ३० टक्क्यांवर थांबेल.

महासागरांतील उत्पादकताही ५ ते १५ टक्क्यांनी कमी होईल. या वाईट काळातून सुटका होण्यासाठी मानवाला किमान १० वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल. वरच्या वातावरणातील काळा धूर संपून सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचला की स्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल, असे हे संशोधन सांगते. ‘भारत-पाक’मध्ये अणुयुद्ध झाले तर त्यात ५ ते १२.५ कोटी लोक थेटपणे मारले जातील.

Leave a Comment