चारा छावणी बंद केल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- कर्जबाजारी असलेल्या व त्यातच चारा छावणी बंद केल्याने एका दिव्यांग शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नगर तालुक्यातील खांडके येथे गुरुवारी घडली. लक्ष्मण संपत गाडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गाडे यांच्या आत्महत्येनंतर संतप्त ग्रामस्थांनी नगर पाथर्डी रस्त्यावरील कौडगाव येथे रास्ता रोको करून प्रशासनाचा निषेध नोंदवला. नगर दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

काही दिवसांपूर्वीच नगर तालुक्यातील घोसपुरी येथेही चारा छावणी बंद केल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. या शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यानंतरही नगर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती कायम आहे. शेतात पीक नाही, जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही. अशा परिस्थितीत शासनाकडून सुरू असलेल्या चारा छावण्या व पाण्याचे टँकर बंद केल्याने जनावरे जगवायची कशी?

या चिंतेने निराश झालेल्या खांडके येथील गाडे या शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. चारा छावण्या व पाण्याचे टँकर प्रशासनाने बंद केल्याने निराश होवून लक्ष्मण गाडे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप उपसरपंच पोपट चेमटे व ग्रामस्थांनी केला आहे.

Leave a Comment