लोकसभा निवडणूकीनंतर महापालिकेत बदल होणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे भेट घेतली असून या भेटीत महापालिकेत शिवसेना व भाजपची युती करण्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.

लोकसभा निवडणूकीनंतर याबाबतच्या हालचाली गतीमान होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेत सेना व भाजपच्या युतीच्या चर्चेने जोर धरला असून

त्या अनुषंगानेच शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, गिरीश जाधव, शाम नळकांड या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आहे.

त्याचबरोबर शहर विकासासाठी निधी, केडगावला स्वतंत्र पोलिस स्टेशन यांसह विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. जून महिन्यामध्ये महापालिकेसंदर्भात पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले असून लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपा व शिवसेनेची युती झाली.

नगरच्या महापालिका निवडणुकीनंतर मनपात सत्ता स्थापनेच्यावेळी राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळाली. भाजप व राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे राज्यभर हा नगरी पॅटर्न गाजला.

शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळवूनही सत्तेपासून त्यांना दूर ठेवण्यात राष्ट्रवादीला यश आले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत सेना व भाजप नेत्यांनी मतभेद विसरत एकदिलाने भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांचे काम केले.

त्यामुळे लोकसभा निवडणूकीनंतर महापालिकेतही सेना व भाजप युतीच्या चर्चांना वेग आला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर या चर्चांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्यातच शिवसेनेने मुख्यमंत्र्यांशी भेटीगाठी घेत चर्चा करुन महापालिकेत युतीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महापालिकेत लोकसभा निवडणूकीनंतर खरच बदल होणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Comment